
चिपळूणमध्ये पुरामुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा सामना आदित्य ठाकरे यांना करावा लागला
मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे हाहा:कार माजलेल्या चिपळूणमध्ये आता पाणी ओसरायला आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महापुरामुळे चिपळूणकरांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. अशावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल चिपळूणचा दौरा केला. त्यावेळी त्यांना चिपळूणकरांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी चिपळूणमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चिपळूणमधील नागरिकांनी वाशिष्टी नदीतील गाळाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे.नुसतेच तुम्ही पर्यावरणमंत्री. पण इकडे काय सुरु आहे हे पाहायला तुम्ही येतच नाही. आमचे पूल वाहून गेले आहेत. नदीत किती गाळ साचलाय. पर्यावरणमंत्री असून तुम्ही काय केलं? असा सवाल चिपळूणमधील एका नागरिकाने आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीही शांतपणे उत्तर दिलं. मला आमदारांनी त्याबाबत सांगितलं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच ते काम होऊन जाईल. मी आता येत राहील, असं उत्तर देत आदित्य ठाकरे तिथून पुढे निघाले. त्यामुळे पुरामुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा सामना आदित्य ठाकरे यांना करावा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं.
www.konkantoday.com