
महामार्गावरील उन्हाड जनावरामुळे अपघाताचा धोका वाढला; मालकांवर कारवाईची गरज
खेड :मुंबई गोवा महामागावरील उनाड पाळीव जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर मधोमध फतकल घालून बसणाच्या या जनावरांमुळे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उन्हाड जनावरे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आधीच अडथळे निर्माण झाले आहे. या अडथळ्याची शर्यत पार करत वाहनचालक कसेतरी मार्गक्रमण करताना दिसत आहेत. मात्र महामार्गावर मधोमध फतकल
घालून बसणाऱ्या उन्हाड जनावरांमुळे हा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.
खेड चिपळूण दरम्यानच्या प्रवासादरम्यान औद्योगिक वसाहतीतून जाणारा महामार्ग उन्हाड जनावरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनला आहे. लोटे परिसरात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात चालकाना वाहनाला बऱ्यापैकी गती देणे शक्य होत आहे. मात्र महामार्गावर ठिकठिकाणी बसलेल्या किंवा कळपाने उभ्या असलेल्या उन्हाड जनावरांमुळे रस्ता चांगला असतानाही वाहन चालकांना वाहनाची गती मर्यादेपेक्षाही कमी राखावी लागत आहे.
महामार्गावरील उन्हाड जनावरांमुळे आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. काहींना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत. महामार्गावरील अपघांना आळा घालण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. उन्हाड जनावरांचा योग्य तो बंदोबस्त केला गेला नाही तर महामार्गावरील अपघाताचा धोका कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com