
आदिवासी दिनाच्या रात्री आश्रमशाळेत काळरात्र; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, आणखी तीन मुली गंभीर, वसतिगृहात…
गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्ह्यात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर आणखी तीन मुलींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात ही घटना घडली. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहात विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वसतिगृह अधीक्षिकेच्या अनुपस्थितीवरही प्रश्न
घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आझाद समाज पार्टीचा तीव्र रोष; निलंबनाची मागणी
या घटनेनंतर ‘आझाद समाज पार्टी’ने आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासनाला धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत. ”संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी एसीमध्ये बसून झोपतात; मात्र आदिवासी आश्रम शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जर अशा हलगर्जीपणामुळे निष्पाप मुलींचे प्राण जात असतील, तर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी राज बन्सोड यांनी केली आहे. तसेच, नैतिक जबाबदारी स्वीकारून विश्वजित कोवासे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद भूषविण्यापेक्षा आपल्या पदाचा राजीनामा देऊन आधी स्वतःची शाळा व वसतिगृह सुरळीत चालवावे, असा घणाघाती इशाराही त्यांनी दिला आहे.




