
रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाचा घणाघात
रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई सुरू ठेवली असून, सन २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत (दि. १ एप्रिल ते ३० जून २०२६) करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३३ लाख ३५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी ५१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, अवैध वाहतुकीच्या दोन प्रकरणांत २५ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
तिमाही अहवालानुसार, या कालावधीत अनधिकृत गौण खनिज उत्खननाची ७ प्रकरणे उघडकीस आली. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांवर एकूण ३३.३५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, अवैध वाहतुकीची २ प्रकरणे नोंदवून त्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिपळूण तालुक्यात सर्वाधिक कारवाई झाली असून, तेथे १८ लाख ५३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. रत्नागिरी तालुक्यात ९ लाख २१ हजार रुपयांचा, तर मंडणगड तालुक्यात ५ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.




