
रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; उद्या अंत्यसंस्कार
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना वाटेत त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय, सामाजिक तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. पक्षसंघटना उभारणीसाठी त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले असून दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती.
राजेश सावंत हे स्पष्ट भूमिका मांडणारे, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे नेतृत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे भाजपसह राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
त्यांना विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
राजेश सावंत यांच्यावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे




