
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र सायंकाळीच बंद; सर्पदंशाच्या रुग्णाला उपचारासाठी दुसरीकडे धाव
रत्नागिरी तालुक्यातील फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे. २४ तास सेवा देण्याचा दावा असतानाही केंद्र सायंकाळीच बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गुरुवारी सर्पदंश झालेल्या सविता संतोष गुरव यांना उपचारासाठी केंद्रात आणले असता दरवाजाला कुलूप असल्याने त्यांना जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवावे लागले. तेथे वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




