
रत्नागिरी जिल्हा बँकांच्या शिपाई भरतीत स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या पुरकपत्रानुसार, चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाची भरती आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून, संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देणे तसेच गावपातळीवरील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आर्थिक बळ देण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची महत्त्वाची भूमिका असते. या बँकांचे कार्यक्षेत्र संबंधित जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




