
रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात फक्त २० दिवसांचा पाणीसाठा
रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) घटल्याने शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने आणि कडक ऊन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने धरणातील जिवंत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या धरणात केवळ पुढील २० ते २५ दिवस पुरेल इतकाच उपयुक्त साठा शिल्लक असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणातील पाणीपातळी खालावल्यामुळे रत्नागिरी शहराचा दर सोमवारी होणारा पाणीपुरवठा अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच सोमवारचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com




