
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानीसाठी १५ मे रोजी मुंबईत ‘चलो मुंबई’ मोर्चा!
सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे यंदाच्या हंगामात कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर तोडगा न निघाल्यामुळे बागायतदारांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी मुंबईत ‘चलो मुंबई’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख आणि काजू बागायतदारांसाठी हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. तसेच नांदगावजवळ मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आश्वासन दिले होते, मात्र अपेक्षित नुकसान भरपाई जाहीर न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
हा मोर्चा शुक्रवार, १५ मे रोजी मुंबईत गिरगाव चौपाटीवरून निघून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत जाणार आहे.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “हवामानाचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आता सरकारला आंदोलनाचा झटका देण्याची वेळ आली आहे.” शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




