
वडील बिस्किट घ्यायला उतरले, तेवढ्यात वंदे भारत सुटली अन् ३ वर्षांची चिमुरडी एकटीच पुण्यात पोहचली
- रेल्वेच्या प्रवासात काही सेकंदाचे अंतर जीवावर बेतू शकतो. एका क्षणात संपूर्ण कुटुंब संकटात सापडू शकते. बापलेकीची ताटातूट होऊ शकते, असाच काहीसा अनुभव पुणे-सोलापूर वंदे भारतने प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला आला.
सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) वंदे भारत एक्सप्रेसमध्ये राहुल खुरमुटे हे कुटुंबियांसह प्रवास करत होते. सोलावूरहून काही अंतर पुढे गेल्यावर गाडी कुर्डुवाडी स्थानकावर थांबली.
भूक लागली म्हणून तीन वर्षांच्या मुलीसाठी बिस्किटे आणण्यासाठी राहुल खुरमुटे कुर्डुवाडीच्या फलाटावर उतरले. ते बिस्किट घेऊन परत येईपर्यंत सोलापूर वंदे भारतची स्वयंचलित दारे बंद झाली होती. गाडीने वेग धरला आणि फलाट सोडले. पण, राहुल खुरमुटेंची ३ वर्षांची मुलगी एकटीच राहिली होती. सुटणाऱ्या गाडीकडे पाहण्याशिवाय राहुल यांच्यासमोर पर्याय नव्हता.
राहुल यांच्या तीन वर्षांच्या चिमुरडीला घेऊन सोलापूर वंदे भारत कुर्डूवाडी स्थानकावरून सुटली. गाडीच्या सी-५ या डब्यात ३० व्या क्रमांच्या आसनावर बसलेली ही लहानगी वडील आले नाहीत म्हणून घाबरली, रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून बरोबरच्या काही प्रवाशांनी तिची विचारपूस केली. तेव्हा तिचे वडील मागच्या स्थानकावरच राहिल्याचे प्रवाशांना समजले.
त्यांनी तातडीने टीटीई एच. एल. मीना यांना ही माहिती दिली. मीना यांनीही वेळ वाया न घालवता रेल्वे कंट्रोल रूमला संदेश पाठवला. त्यानंतर पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाने रेल्वे पोलीसांना या प्रकाराची माहिती दिली. पुणे विभागात कार्यरत असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल विनय प्रकाश आणि एएसआय एन. एन. नलावडे यांनी मुलीला तिच्या वडिलांपर्यंत पोहचवायचे ठरवे.
सोलापूर वंदे भारत पुण्याच्या दिशेने धावत असताना वडिलांच्या चिंतेने घाबरलेल्या चिमुकलीला आधार देण्याची गरज होती. एका महिला प्रवाशाने मुलीला जवळ घेत तिला आधार दिला. शांत केले. तोपर्यंत रेल्वे पोलीसांनी मुलीच्या वडिलांची म्हणजे राहुल खुरमुटेंची माहिती त्यांच्या आरक्षणावरून मिळवली. पोलीसांनी राहुल यांच्याशी संपर्क साधला. तेही खूप घाबरले होते. रेल्वे पोलिसांनीच राहुल यांना धीर देत, दुसऱ्या गाडीने पुण्याला येण्यास सांगितले.
शेवटी, मुलीच्या आईला वैशाली खुरमुटे यांना तातडीने पुणे स्थानकावर बोलवण्यात आले. वंदे भारत पुणे स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलीसांनी या चिमुकलीला तिच्या आईकडे सोपवले. मुलीला सुखरूप पाहून आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. खुरमुटे कुटुंबाने रेल्वे पोलीस आणि टीटीई मीना यांचे आभार मानले. रेल्वे पोलीसांच्या सतर्कतेमुळे खुरमुटे कुटुंबावर कोसळलेले एक मोठे संकट आता दूर झाले होते.
प्रवाशांना आवाहन
वंदे भारत एक्सप्रेसची दारे स्वयंचलित असतात. एकदा बंद झालेली दारे पुन्हा उघडणे कठीण असते. त्यामुळे गाडी थांबलेली असताना फलाटावर उतरणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांना करण्यात आले आहे.




