
बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (2 मे) जाहीर करण्यात येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (2 मे) जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर केला होता. त्यामुळे यंदा राज्य मंडळाकडून थोडा लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबत अधिकृत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थ्यांची संख्या २७ हजारांनी वाढली होती. यंदाच्यापरीक्षेसाठी नोदणी केलेल्या १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यात कला शाखेचे ३ लाख ८० हजार ६९२, वाणिज्य शाखेचे ३ लाख २० हजार १५२, विज्ञान शाखेचे ७ लाख ९९ हजार ७७३, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २७ हजार ३७८, तर आयटीआयचे ४ हजार ४९२ विद्यार्थी समाविष्ट होते.




