मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन मध्ये मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न”

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ आणि ‘आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी’ याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम आसमंत फाउंडेशन, रत्नागिरीच्या महिला सबलीकरण कार्यक्रम अंतर्गत आर्थिक सहाय्याने ‘परिषद दालन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. राजेश ठोकळ, मा. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करायचा असेल तर, पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होईल असे सांगितले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, श्री. चिन्मय दामले, जिल्हा समन्वयक, जलजीविका संस्था, रत्नागिरी तसेच लोककल्प फाउंडेशन, रत्नागिरी चे श्री. अभिषेक कात्रे हे उपस्थित होते.
या मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणा मध्ये एकूण ६९ लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम उमेद-क्रांती प्रभाग संघ च्या तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव, काळबादेवी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे यांचे प्रात्यक्षीक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे श्रीमती अपूर्वा सावंत, श्रीमती वर्षा सदावर्ते, डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, आणि प्रा. सचिन साटम यांनी करून दाखविले. बोंबील चटणी व मत्स्य चकली यांचे प्रात्यक्षीक जलजीविका, रत्नागिरीचे समृद्धी सनगरे, यांनी करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी डोंगरे (मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन) यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नंदिनी शेटये (काळबादेवी) यांनी केले.
सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सहभागी शेतकरी महिलांपैकी श्रीमती सोनाली शिवलकर (क्रांती, एफ.पी.ओ., मास्टर सी.आर.पी.) यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान, रत्नागिरी येथील श्री. निलेश मिरजकर, डॉ. राकेश जाधव, श्री. सुशील कांबळे, श्री रोहित बुरटे, श्री. पंकज सिडाम, श्री संदेश चव्हाण, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकरी डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीमती वर्षा सदावर्ते आणि श्रीमती अपूर्व सावंत यांनी मेहनत घेतली. तसेच जलजीविका, रत्नागिरीचे पीयूषा देसाई, शशांक पंडित, सुमित कुळये, लोककल्प फाउंडेशनचे श्री. जोशी आणि श्री हरमळे यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button