कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम


संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू असून सुमारे २६३ किलोमीटर मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोकणातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाची मागणी तसेच स्थानिक प्रवाशांच्या विविध अडचणी प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे.

मुकादम पुढे म्हणाले की, कोकणातून धावणाऱ्या गाड्यांचा फायदा स्थानिकांपेक्षा परप्रांतीय प्रवाशांना अधिक होत आहे. काही स्थानिकांसाठी सुरू असलेल्या गाड्या बंद करण्यात येत असून सिग्नलच्या कारणांवरून दिशाभूल केली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तसेच बसायलाही जागा मिळत नसल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गाड्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच चिपळूण जंक्शन येथे सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे आणि दादर-चिपळूण स्वातंत्र्य गाडी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली असताना त्यांच्याच प्रवासाची गैरसोय होणे अन्यायकारक असल्याचे सांगत, स्थानिकांना रेल्वे भरतीतही न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय दुपदरीकरणाचे काम होऊ देणार नाही, असा ठाम इशारा मुकादम यांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button