काँग्रेसमध्ये आता ‘कार्यकर्ता’च होणार ‘नेता’

रत्नागिरीत दोन जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून!

रत्नागिरी : काँग्रेस पक्ष संघटनेत आता मोठे फेरबदल पाहायला मिळणार असून, जिल्हाध्यक्ष निवडीची जुनी ‘थेट नियुक्ती’ पद्धत आता इतिहासजमा झाली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या नवीन संकल्पनेनुसार, आता नेत्याच्या शिफारशीपेक्षा कार्यकर्त्यांच्या पसंतीला महत्त्व दिले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत जिल्हाध्यक्षांची निवड वरिष्ठ पातळीवरून थेट केली जात असे. मात्र, राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार ही पद्धत बदलण्यात आली आहे. दानिश अब्रार यांनी स्पष्ट केले की, “काँग्रेसला केवळ खुर्च्या उचलणारा किंवा झेंडे लावणारा कार्यकर्ता नको आहे, तर लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा खंबीर कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्ताच आता आपला नेता निवडणार आहे.”
निवडीची प्रक्रिया आणि वेळापत्रक
जिल्हाध्यक्ष पदासाठीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने राबवली जाणार आहे. एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. २० एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मते जाणून घेतली जातील. मे महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील दीड महिन्यात नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल.
या पदासाठी पक्षाचा कोणताही निष्ठावान कार्यकर्ता किंवा नेता आपला अर्ज भरू शकणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार विचारात घेता, पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यानुसार उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी अशा दोन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सचिव अब्रार हे स्वतः कार्यकर्त्यांशी चर्चा करून मिळणारी माहिती आणि आलेले अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त करणार आहेत.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, जिल्ह्याचे विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

“कार्यकर्ता हा केवळ खटले अंगावर घेण्यासाठी नसून, त्याला सत्तेत आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे. ही नवी प्रक्रिया कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरेल.”

  • दानिश अब्रार, राष्ट्रीय सचिव, काँग्रेस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button