
लोटे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात आज कोकण नागरी संघर्ष समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्यातर्फे धडक मोर्चा
कोकण नागरी संघर्ष समिती व स्थानिक ग्रामस्थ यांच्यातर्फे लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीत होणाऱ्या पीफास उत्पादनांविरुद्ध 6 एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.पीफास रसायनांना जगभरात फॉरेव्हर केमिकल्स (कधीही नष्ट न होणारी रसायने) म्हणून ओळखले जाते. कारण ती निसर्गात कधीही विघटीत होत नाहीत. आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार या रसायनांचा संबंध कर्करोग, यकृताचे आजार आणि पुढच्या पिढ्यांमधील जन्मजात व्यंगांशी जोडला गेला आहे. विकसित देशांमध्ये या रसायनांवर कडक निर्बंध आहेत. भारतात सध्या पीफासवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही विशिष्ट धोरण किंवा बंदी अस्तित्वात नाही. गेले दोन महिने अशोक जाधव व राजू आंब्रे यांचे उपोषण सुरू आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पीफासचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत पीफासला धोकादायक पदार्थ म्हणून अधिसूचित करावे. पर्यावरणाची हानी होण्यापूर्वीच सरकारने ती रोखली पाहिजे, असे कोकण नागरी संघर्ष समिती व स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 6 एप्रिल रोजी एक दिवस आमच्यासोबत या. तुम्ही विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कामगार किंवा पालक असाल, तुमचा पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी केले आहे.



