
रत्नागिरीतील निवळी तिठा येथील भरावाच्या पुलाच्या सिमेंट प्लेट्स अचानक कोसळल्याची घटना
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना बुधवारी समोर आला आहे. रत्नागिरीतील निवळी तिठा येथील भरावाच्या पुलाच्या सिमेंट प्लेट्स अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेच्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने अनर्थ टळला. मात्र या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुरावे देऊनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप जि.प.चे माजी सभापती परशुराम कदम यांनी केला आहे.
या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कदम यांनी १० दिवसांपूर्वीच, म्हणजेच १५ मार्च रोजी संबंधित अधिकार्यांना व्हॉटसऍपद्वारे सविस्तर माहिती दिली होती. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, अधिकार्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्याचाच परिणाम बुधवारी या सिमेंटच्या प्लेट्स कोसळण्याची घटना घडल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
याठिकाणी केवळ सिमेंटच्या प्लेट्स पुन्हा बसवून हा प्रश्न सुटणार नाही, तर संपूर्ण पुलाच्या कामाची तांत्रिक तपासणी होणे गरजेचे आहे. जर तातडीने लक्ष दिले नाही, तर या सर्व्हिस रोडवरून प्रवास करणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com




