चिपळूण अर्बन बँक पारदर्शक कारभाराचा आदर्श : ना. उदय सामंत

नूतन इमारतीचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन

चिपळूण : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन चिपळूण शहरातील बाजारपेठेत उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी बँकेच्या पारदर्शक व समन्वयातून चालणाऱ्या कारभाराचे कौतुक करत, “चिपळूण अर्बन बँक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावी अशी संस्था आहे,” असे गौरवोद्गार काढले. उद्घाटनानंतर राजाभाऊ रेडीज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष अजय खातू, कोअर कमिटी सदस्य उमेश काटकर, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, शौकत मुकादम, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबू तांबे, माजी नगरसेवक विलास खेराडे, उदय गांधी, सतीशअप्पा खेडेकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, अॅड. भाऊ दळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक लोकप्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून संचालक मंडळ सर्वपक्षीय समन्वयाने काम करत आहे. बँकेच्या प्रगतीसाठी राजकारण बाजूला ठेवून कार्य केले जाते, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची एकच केबिन असणे ही देखील एक वेगळी आणि प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. १९३३ साली स्थापन झालेल्या या बँकेला ९३ वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला असून, या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी सांगितले की, रावसाहेब खातू यांनी ९३ वर्षांपूर्वी सहकाराचे छोटे रोपटे लावले आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दूरदृष्टी ठेवून उभारलेली ही आधुनिक वास्तू भविष्यात बँकेच्या प्रगतीस नवे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, १९३३ साली अवघ्या ५०-६० रुपयांत सुरू झालेली ही बँक आज सुमारे ७०० कोटींच्या व्यवहारांपर्यंत पोहोचली आहे, ही प्रगती अभिमानास्पद आहे.

आमदार शेखर निकम यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, तर आमदार भास्करशेठ जाधव यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीच १९३३मध्ये बँकेची स्थापना झाली, ही तत्कालीन नेतृत्वाची दूरदृष्टी असल्याचे सांगितले. “या बँकेचा पाया भक्कम असून भविष्यातही सहकार क्षेत्रात ती यशाचा झेंडा फडकवत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या प्रामाणिक व कष्टाळू नेतृत्वाचे कौतुक केले.

यावेळी बँकेच्या ९३ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या “स्मृतिगंध” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच इमारत उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे प्रशासन विभाग प्रमुख समीर जंगम व संबंधित ठेकेदारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजय खातू यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button