
आझाद मैदान येथे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी संघटनेचे साखळी उपोषण सुरू
मुंबई : पदवीधर अंशकालीन पदवीधर शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सोमवार दिनांक 16 मार्चपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात राज्यातील विविध विभागांतील पदवीधर अंशकालीन कर्मचारी सहभागी झाले असून सरकारने त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविणे तसेच तीन वर्षे अंशकालीन स्वरूपात सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांची ती सेवा कायम सेवेत जोडून देणे या मागण्यांचा समावेश आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दीर्घकाळापासून या मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक वेळा निवेदने व पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.




