द्राक्षाचे 1,800, केळीचे 1, 200 कंटेनर आखातातून माघारी

नाशिक : युद्धामुळे इराण नजीकच्या समुद्रात अडकून पडलेली केळी, द्राक्षाचे कंटेनर जेएनपीटी बंदरात माघारी परतत आहेत. इराण, ओमान, कुवेत येथील खरेदीदारांनी कंटेनरमधील शेतमाल उतरवण्यास नकार दिल्याने तीन हजार कंटेनर जेएनपीटी बंदराकडे निघाले आहेत. या तीन हजार कंटनेरपैकी १,२०० कंटेनर केळीचे असून, उर्वरित १,८०० कंटेनर द्राक्षाचे आहेत.

गेल्या वर्षी आखातात झालेली केळींची ३,५०० कोटी रुपयांची तर द्राक्षांची ३,४०० कोटी रुपयांची निर्यात यंदा युद्धामुळे धोक्यात आल्याने भारत सात हजार कोटी रुपयांच्या महसुलास मुकणार आहे. युद्धाअगोदर जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर येथून द्राक्ष तसेच केळी निर्यातीसाठी तीन हजार कंटेनर जेएनपीटीतून गेल्या आठवड्यात निघाले होते. परंतु, इस्रायल अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे हॉर्मुझ तसेच ओमानच्या आखातात ७० ते ८० जहाजे अडकून पडली होती.

इराणने ओमानच्या बंदरांवर हल्ल्याने व्यापाऱ्यांनी शेतमाल उतरणे थांबवले. तीच परिस्थिती इराणमध्ये आहे. भारतातील माल तेथे उतरवून तो पुढे सौदी अरेबिया, कतारसह अन्य देशात रवाना होतो. महाराष्ट्रातून पाठवलेले ८०० ते १००० कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत. महाराष्ट्रातील १६ हजार टन द्राक्ष या विविध टप्प्यांवर अडकले आहे.

सोलापूरच्या त्रिमूर्ती फ्रूट कंपनीचे अभिजित पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले की, रवाना झालेले १००० कंटेनर आखातातून जेएनपीटीकडे परत निघाले आहेत. यातील ३५० कंटेनर केळीचे तर उर्वरित द्राक्षांचे आहेत. निर्यातीसाठी २४ ते २८ रुपये किलोने खरेदी केलेले केळी मुंबईत ७ ते ८ रुपये दराने विक्री करावी लागणार आहे.

दरवर्षी सोलापूरातून ३५ हजार कंटेनर केळी, द्राक्ष आखातात निर्यात होतात. सोलापुरात ३० ते ३५ मोठे कोल्ड स्टोअरेज असून, ३० ते ४० कोटींच्या केळी आणि द्राक्षे पडून आहे. चोपडा येथील निर्यातदार संदीप पाटील यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आखातात पाच हजार कंटनेर केळीची निर्यात केली होती.

यंदा निर्यातदारांनी २५ हजार कंटेनरचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, युद्धामुळे हे उद्दिष्ट अशक्य आहे. कंटनेर माघारी येत असल्याने केळीचा भाव २५ रुपयांवरून १४ रुपयांवर आला. खान्देशमधील शेतकऱ्यांना क्विंटलला हजार रुपयांचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. एका कंटेनरमध्ये ३० टन केळी जातात. त्याचे मूल्य १० लाख रुपये होते. गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्याने ५०० कोटींचा माल निर्यात केला होता.

दोन हजार कोटींनी केळी निर्यातीत घट

भारत दरवर्षी दीड ते दोन लाख मे. टन केळी आखातात पाठवतो. भारताने २०२३-२४ मध्ये ३,५०० कोटी रुपयांच्या केळींची निर्यात केली. भारताच्या निर्यातीपैकी ८२ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आखाती देशांचा आहे.

इराक (१४७दशलक्ष डॉलर्स), इराण (६०.९ दशलक्ष डॉलर्स), संयुक्त अरब अमिराती (४३.८ दशलक्ष डॉलर्स) आणि ओमान (२०.४ दशलक्ष डॉलर्स) हे भारतीय केळीचे खरेदीदार आहेत.

द्राक्ष निर्यातीचे ४ हजार कोटी जाणार

भारताने गेल्या वर्षी ३,४३,९८२ मे. टन द्राक्ष निर्यात केले होते. त्यातून ३,४६०.७० कोटींचे विदेशी चलन मिळाले. त्यातील ८० टक्के चलन आखातातून मिळाले. संयुक्त अरब अमिराती हे भारतीय द्राक्षांच्या प्रमुख आयातदार आहे. २०२४ मध्ये भारताने यूएईला ३३.४१ दशलक्ष डॉलर्सची द्राक्षे निर्यात केली. युरोपात भारतीय द्राक्षांना १८० तर आखातात १४० रुपये दर मिळतो. आखातात द्राक्षटंचाईमुळे दर ३०० रुपये किलोपर्यंत झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button