
वैद्यकीय हलगर्जीपणा सिद्ध करण्यात अपयश, रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दावा फेटाळला
रत्नागिरी शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या संसर्गासाठी डॉक्टरांना जबाबदार धरून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दाखल केलेली तक्रार रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांने फेटाळून लावली आहे. तक्रारदार महिला डॉक्टरांचा वैद्यकीय हलगर्जीपणा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत अध्यक्ष इंदुमती मलुष्टे, सदस्य स्वप्निल मेढे आणि अमृता भोसले यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील रहिवासी वैशाली संजय रहाटे यांनी सांगली येथील डॉ. महेश भीमसेन जाधव आणि डॉ. मदन भीमसेन जाधव यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी २१ मार्च २०१९ रोजी डॉ. महेश जाधव यांच्याकडे सल्ला घेतला होता. या शस्त्रक्रियेसाठी १ लाख २० हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला होता. डॉ. महेश जाधव यांच्याकडे आयसीयूची सुविधा नसल्याने १३ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचे बंधू डॉ. मदन जाधव यांच्या क्लिनीकमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या जखमेतून पू आणि द्रव येत होता. प्रकृती पूर्णपणे सुधारलेली नसतानाही त्यांना जबरदस्तीने डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना रत्नागिरी आणि कोल्हापूर येथील विविध रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, ज्यासाठी ज्यांना सुमारे ३ ते ४ लाख रुपये अतिरिक्त खर्च आला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास झाल्याचा दावा करत त्यांनी १५ लाख ७६ हजार रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती.www.konkantoday.com




