
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिन’इंद्रायणी महासीर ए कॉन्झर्वेशन जर्नी’ चे प्रकाशननवा शोध घेताना जुना बोधही महत्त्वाचा- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी, दि. 26 ):- नवा शोध घेताना, अनुभवातून घेतलेला जुना बोधही तितकाच महत्त्वाचा असतो. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहीत नागलगाव लिखित ‘इंद्रायणी महासीर ए कॉन्झर्वेशन जर्नी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री सातपुते यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी, उप कुलसचिव अभिनंदन बोरगावे, डॉ. पी. वाय. पाटील, डॉ. नागलगाव, कांदळवनचे वैभव बोंबले उपस्थित होते.
श्री. सातपुते यावेळी म्हणाले, थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी त्यांचा जगप्रसिध्द ‘रमण प्रभाव’ हा 28 फेब्रुवारी 1928 रोजी जगासमोर मांडला. या महान शोधासाठी 1930 मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
मानवाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतानंतरही जे काही घडते, वापरले जाते, त्यात विज्ञान सामावलेले असते. पहिला श्वास म्हणजे ऑक्सीजन आणि अत्यंविधीनंतरची राख म्हणजे कार्बन! विज्ञानाने आपले जीवन सोपे आणि सुखकर केले आहे. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोण रुजणे काळाची गरज आहे. का? कसे? असे प्रश्न पडले पाहिजेत. शिवाय ते विचारण्याची सवय लावली पाहिजे.
विज्ञानाचा उपयोग सुसंस्कृत समाजासाठी करुया. आपल्यातील कुतूहुल जिवंत ठेवून नवनवीन शोध लावण्याचा प्रयत्न करुया. त्यासाठी विज्ञानाचा कास धरा, असेही ते म्हणाले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, लहान वयात विज्ञानाचा अभ्यास करावा. विज्ञान अवघड वाटत असले तरी ते नाही. भीती काढून टाका. विज्ञानाची आवड वाटली पाहिजे. जगात संशोधन क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. संशोधनाकडे वळायला हवे. त्यासाठी दृष्टी हवी. चिकाटीने काम करायला हवे. प्रत्येक गोष्टीत उत्सुकता हवी. मनात प्रश्न आले पाहिजेत. एक साधा प्रश्नही मोठी क्रांती करुन जातो.
इंग्रजीमध्ये जरी सर्व संशोधन उपलब्ध असले तरी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, डॉ. जगदीशचंद्र बोस या सर्वांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले आहे. देशासाठी काम करताना विज्ञानाचा अभ्यास करा, त्यासाठी वाचन वाढवा, असेही ते म्हणाले.
यावेळी पर्यावरणाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकाशित पुस्तकाविषयी डॉ. नागलगाव यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापिक ऋजुदा जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी रा.भा.शिर्के प्रशालेचे गुरुकुल प्रमुख किरण सनगरे, श्रुती काटे, श्रेयस फटकरे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. बोरगावे यांनी केले.




