
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत! अर्थमंत्र्यांकडून हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली. हायस्पीड रेल्वेमुळे १७० किमीचा हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटात पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. तसेच, पुणे-हैदराबाद हा ५५० किमीचा प्रवास केवळ १ तास ५५ मिनिटात होणार आहे.
पश्चिम बंगालमधील डानकुनी ते गुजरातच्या सुरत दरम्यान नव्या मालवाहतूक कॉरिडॉरचा प्रस्ताव आहे. पर्यावरणपूरक आणि वेगवान प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सात हायस्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. यामध्ये मुंबई-पुणे हा महाराष्ट्रातील प्रमुख प्रस्तावित कॉरिडॉर आहे. मुंबई आणि पुणे ही राज्यातील आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रे असून या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. सध्या अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानंतर मुंबई-पुणे हा देशातील महत्त्वाच्या हायस्पीड रेल्वे मार्गापैकी एक ठरणार आहे.
२.७७ लाख कोटी रूपयांची तरतूद रेल्वेसाठी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी रेल्वे मंत्रालयाला २,७७,८३० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर केले आहेत. ही तरतूद आतापर्यतची सर्वाधिक आहे. रेल्वेच्या खर्चापैकी मोठा वाटा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर खर्च होतो. २०२४-२५ मध्ये पेन्शनवरील खर्च ५८८४४ कोटी रुपये होता, जो २०२६-२७मध्ये ७४५०० कोटी इतका वाढण्याची शक्यता आहे.




