ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन


महाराष्ट्राला लाभलेल्या महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांच्या मालेतील आजच्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव यांचे 8 डिसेंबर रोजी रात्री रोजी 8.25 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.अखेर पर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर वयाच्या 95 वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज (9 डिसेंबर मंगळवार) सायंकाळी 5.30वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई, मुले असीम व अंबर, सुना नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, आणीबाणी विरुद्धची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, मनू पुतळा हटाव मोहीम, असंघटित वर्गातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी पुणे ते दिल्ली सायकल मोर्चाचे आंदोलन या चळवळीचे ते अर्धयू होते. एक जून 1930 रोजी जन्मलेल्या डॉ.आढाव यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. पितृछत्र लवकर हरपल्यावर त्यांची आई बबुताई यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या सर्व मुलांना वाढवले. बाबा यांनी वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. कोणतेही काम अभ्यासपूर्ण व तळमळीने करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे अल्पावधीतच ते ‘चांगला हातगुण’ असणारे डॉक्टर म्हणून हडपसर पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. मूळ समाजसेवकाचा त्यांचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी हडपसर मध्येच डॉ. दादा गुजर, डॉ.गोपाळ शहा यांच्याबरोबर साने गुरुजी रुग्णालय सुरू केले. अतिशय अल्प दरात उत्तम उपचार देणारे रुग्णालय म्हणून साने गुरुजी रुग्णालय प्रसिद्धीला येऊ लागले.मात्र डॉ. बाबा आढाव यांना आसपासची सामाजिक परिस्थिती स्वस्थ बसू देत न्हवती. पूर्ण वेळ सामाजिक कार्य करण्याचे त्यांना वेध लागले होते. वाढीला लागलेल्या या रुग्णालयातून ते सहज बाहेर पडले. ते राहत असलेल्या नाना पेठेतही ते दवाखाना चालवायचे. तिथे उपचारासाठी येणाऱ्या नाना भवानी गणेश या व्यापारी पेठे मधील हमालांच्या व्यथा वेदना या कष्टकरी रुग्णांना तपासता तपासता ते ऐकत. त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तर वर्षांपूर्वी हमाल पंचायत संघटना त्यांनी स्थापन केली. हमाल पंचायत द्वारे त्यांनी उभे केलेले कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था, कष्टकरी विद्यालय यासारखे रचनात्मक काम शब्दशः जगप्रसिद्ध आहे. या कामाचा अभ्यास करायला परदेशी विद्यापीठातूनही अभ्यासक पुण्यात येत असतात. तर बाबांच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांनी वरील ठिकाणी आणि वेळीच यावे इतर कोठेही गर्दी करू नये असे आवाहन आढाव कुटुंबीयांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button