कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 250 हून अधिक भाविकांना विषबाधा!


कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद खाल्ल्यानंतर तब्बल 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारनंतर उलटी, जुलाब, पोटदुखी व मळमळ यासारखी लक्षणे दिसू लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. लहान मुले, महिला, पुरुष व वृद्धांसह आजूबाजूच्या 10 ते 15 गावांतील भक्तांना हा त्रास झाला असून, बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांबरे गावात शुक्रवारी सकाळी दत्त जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या सोहळ्याला जवळपास दोन हजारहून अधिक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर अचानक अनेकांची तब्येत बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 100 ते 125 रुग्णांवर नेसरी ग्रामीण रुग्णालय आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, तर इतरांना कानडेवाडी, माणगाव, कोवाडसह खासगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य यंत्रणेवर ताण; जमिनीवर उपचार

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. रुग्णालयांमध्ये बेड अपुरे पडल्याने काहींवर जमिनीवरच उपचार करण्यात आले. यावेळी औषधे आणि इतर सुविधांचीही कमतरता भासली असून, नातेवाईकांच्या गर्दीने रुग्णालय परिसर भरून गेला होता. तर बेळगावातील केएलई वैद्यकीय संघाची टीमही सांबरे गावात दाखल झाली असून, ती तपासणी करत आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असली, तरी इतरांनी त्रास झाल्यास घाबरून न जाता नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत आणि तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाने गावात पथके पाठवून घरोघरी तपासणी सुरू केली असून, महाप्रसादाचे नमुने प्रयोगशाळेसाठी पाठविण्यात येणार आहेत.

महाप्रसादातून इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांतील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भविष्यात अशा प्रकार टाळण्यासाठी कडक नियम लागू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. तर परिसरातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button