
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या सुरक्षेशी खेळ झाला, तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल-अभिजित दीपके
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे.जरांगे यांच्या ढासळत्या प्रकृतीवरून आणि सरकारच्या भूमिकेवर बोलताना ‘. अभिजित दीपके’ यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. जर जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या सुरक्षेशी खेळ झाला, तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा आक्रमक इशारा दिपकेंनी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…
मराठा आरक्षणाच्या रास्त मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज १४ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या निर्दयी सरकारकडून अद्याप कोणतीही विचारपूस किंवा उपोषण सोडवण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. जरांगे हे स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत. सरकारने सोनम वांगचुक यांना उचलून आंदोलन मोडीत काढण्याचा जसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न जर इथे जरांगे यांच्या बाबतीत केला तर लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे! जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल,” असा खणखणीत आणि गंभीर इशारा ॲड. अभिजित दीपके यांनी राज्य सरकारला दिला आहे.सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना दीपके म्हणाले, “या सरकारला कॉमेडीयनला भेटायला आणि त्यांना बिस्किटं खाऊ घालायला वेळ आहे, पण समाजासाठी जीवाची पर्वा न करता १४ दिवसांपासून उपाशी बसलेल्या मनोज जरांगेंशी बोलायला वेळ नाही. हे अत्यंत संतापजनक आणि अयोग्य आहे. सरकारने स्वतः इथे येऊन जरांगेंशी सन्मानपूर्वक चर्चा केली पाहिजे.”




