
राजापूर रेल्वे स्थानकातील रिक्षा स्टँडवर वडाप वाहतुकीचा आरोप
दोन काळी-पिवळी चारचाकी वाहनांवर कारवाईची मागणी; रिक्षाचालकांमध्ये नाराजी
राजापूर : राजापूर रेल्वे स्थानक परिसरातील अधिकृत रिक्षा स्टँडवर काही काळी-पिवळी चारचाकी वाहनांकडून प्रवासी वाहतूक (वडाप) केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अधिकृत रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित वाहनांची चौकशी करून नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक-मालक संघटनेचे ज्येष्ठ सभासद अंकुश विश्राम गुरव यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
गुरव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. राजापूर रेल्वे स्थानक येथे रिक्षाचालकांसाठी अधिकृत स्टँड असून रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करून रिक्षाचालक आपला व्यवसाय करतात. मात्र, काही काळी-पिवळी चारचाकी वाहने या ठिकाणी प्रवासी वाहतूक करीत असल्याने अधिकृत रिक्षाचालकांच्या व्यवसायावर आर्थिक परिणाम होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीत एमएच-०८-५१८५ आणि एमएच-०८-एपी-१६६९ या दोन चारचाकी वाहनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वाहनांकडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून अधिकृत रिक्षा स्टँडवर संबंधित वाहनांना पार्किंग करण्यास मज्जाव करावा, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास वाहनचालक व मालकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात २१ जुलै २०२६ रोजी छायाचित्रांसह तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्याप या तक्रारीची चौकशी अथवा कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवापूर्वी कारवाईची मागणी
गणेशोत्सव तोंडावर आला असून या काळात राजापूर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत अथवा नियमबाह्य प्रवासी वाहतुकीला आळा घालून अधिकृत रिक्षाचालकांना व्यवसायासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकरणाकडे राजापूर पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिक्षा व्यावसायिक अनिल गुरव यांनी केला आहे. संबंधित दोन वाहनांचे चालक व मालक रिक्षा व्यावसायिकांशी अरेरावीची भाषा करीत असून शिवीगाळही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या उपस्थितीतही कथित दादागिरी केली जात असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती मध्यस्थी होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या कथित दुर्लक्षामुळेच संबंधित दोन्ही वाहने राजरोसपणे प्रवासी वाहतूक करीत असल्याचा आरोप अनिल गुरव यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या तक्रारीच्या प्रती पोलिस अधीक्षक, रत्नागिरी, राजापूर पोलिस ठाण्याचे संबंधित अधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी संबंधित वाहनांची चौकशी करून नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.



