
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २० जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात देखील रविवारी रात्रभर धो-धो पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने सकाळी ७ वाजता जाहीर केलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची, सागार बेटे ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत १.५ किलोमीटर उंच कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. शिवाय मध्य प्रदेशात समुद्राच्या सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या सर्व प्रणालींमुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांने पुन्हा वेग पकडला आहे.
मुंबई-पुण्यातील हवामान
मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. हवामान विभागाने सकाळी सात वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासह पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.कोकणातील हवामान कसं असेल?
पावसाचा जोर ओसरला होत तेव्हाही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. २० जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.



