जिल्ह्यातील अपंगांच्या मागे नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी रत्नागिरी संस्था भक्कमपणे उभी

अपंगांच्या न्याय हक्कासाठी लढणार – अध्यक्ष रमजान गोलंदाज

🔴 पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच रत्नागिरी जिल्हास्तरीय भव्य अपंग मेळावा आयोजित करण्याची घोषणा

रत्नागिरी |

“अपंग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगण्याचा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वावलंबन आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी, रत्नागिरी ही संस्था जिल्ह्यातील प्रत्येक अपंग बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील,” अशी ठाम भूमिका संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी व्यक्त केली.

नवनिर्मिती फाउंडेशनच्या पुढाकाराने चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील अपंग संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी यांच्या प्रमुख बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसमोरील विविध समस्या, शासनाच्या योजनांचा लाभ, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, स्वावलंबन आणि पुनर्वसन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी सांगितले की, 👉🏻अपंग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर त्यांचे हक्क मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या अनेक योजना असूनही त्या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. त्यामुळे नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बळ उभे करून दिव्यांगांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.

बैठकीत प्रत्येक तालुक्यात संपर्क समित्या स्थापन करणे, गावागावांत सदस्य नोंदणी अभियान राबविणे, शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे, तसेच दिव्यांगांसाठी कायदेशीर मार्गदर्शन व विविध शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी लवकरच रत्नागिरी जिल्हास्तरीय भव्य अपंग मेळावा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. या मेळाव्यात जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांना एकत्र आणून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणे, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून योजनांचा थेट लाभ उपलब्ध करून देणे आणि दिव्यांग सक्षमीकरणासाठी व्यापक अभियान सुरू करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

बैठकीस चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील अपंग संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नवनिर्मिती फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करत नवनिर्मिती फाउंडेशनच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी अध्यक्ष सादिकभाई नाकाडे, समीर नाकाडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसकुटे, संजय सुर्वे, शेखर चाळके, दीपक बाइग,जिब्रान तांडेल, उमेर खान तलाह खान असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button