लोटे एमआयडीसीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; डिजिटल प्रदूषण निर्देशांक बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी


रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही भागात उग्र वास आणि धुराचे लोट जाणवत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. पावसाच्या काळात काही उद्योगांकडून प्रदूषण सोडले जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

याचबरोबर, कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) परिसरात हवेच्या गुणवत्तेची माहिती देण्यासाठी बसविण्यात आलेला डिजिटल प्रदूषण निर्देशांक फलकही सध्या बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही यंत्रणा कार्यरत नसल्याने प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या डिजिटल फलकाच्या माध्यमातून परिसरातील हवेच्या गुणवत्तेची माहिती नागरिकांना रिअल टाइममध्ये उपलब्ध व्हावी, हा उद्देश होता. मात्र सध्या फलक बंद असल्याने प्रदूषणाच्या स्थितीबाबत नागरिकांना कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गालगतच्या परिसरात पुन्हा उग्र वास आणि धुराचे प्रमाण वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून, प्रदूषण नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणांची नियमित देखभाल आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button