आणीबाणी वेळी माझे वय कमी होते, नाहीतर मी सुद्धा त्या सत्याग्रहात सहभागी झालाे असतो- खासदार नारायण राणे ,भाजपतर्फे आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त सत्याग्रहींचा सत्कार


रत्नागिरी : आणीबाणीत जनतेला होणाऱ्या त्रासाविरोधात तुम्ही सत्याग्रहींनी तुरुंगवास भोगला. कृतज्ञतेच्या भावनेने सत्कार करत आहोत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतःचा बचाव करताना कायद्याचा, घटनेचा दुरुपयोग करून आणीबाणी जाहीर केली. देशासाठी, धर्मासाठी आंदोलन केले, हा एक प्रकारचा त्याग होता. त्याचे प्रतिक म्हणून आपला सन्मान झाला, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले. आणीबाणी वेळी माझे वय कमी होते, नाहीतर मी सुद्धा त्या सत्याग्रहात सहभागी झालाे असतो, असेही खासदार राणे यांनी नमूद केले.

भाजप दक्षिण रत्नागिरीतर्फे विवा एक्झिक्यूटीव्ह येथे आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त संविधान हत्या दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले डॉ. संजय केतकर, विवेक भावे यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, सहसंयोजक अभय चितळे, राजू भाटलेकर उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष यादव म्हणाले की, आणीबाणीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. त्यांचे स्मरण करत लोकशाही अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. याकरिता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानल्या जाणाऱ्या २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आली. याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील ३ लाखांहून अधिक देशप्रेमी, रा. स्व. संघ स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यातील जिल्ह्यात १८० जण असून काही जण आज हयात नाहीत, अशी माहिती या वेळी सांगण्यात आली.

याप्रसंगी विवेक भावे, डॉ. संजय केतकर, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, गोपाळकृष्ण रायकर, प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, तसेच तुकाराम तोसकर, शिवराम ठीक आदींचा सन्मान खासदार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला इंदिरा गांधींनी आणीबाणी कशी लागू केली व त्याचा भारतीयांना कसा त्रास झाला यावर आधारित ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली.

कार्यक्रमात डॉ. संजय केतकर यांनी १९७१ मध्ये केलेला मिसा कायदा, त्यानंतर न्यायालयात लागलेला निकाल व नंतर लादलेली आणीबाणी यावर विस्तृत माहिती दिली. विवेक भावे म्हणाले की, आणीबाणीत तुरुंगवास भोगला. आज त्याला ५१ वर्षे होत आहेत. आणीबाणी लादल्याने त्याविरोधात निषेध करण्यासाठी पाऊल उचलले. रा. स्व. संघावर बंदी आली, त्यावेळी सावंतवाडी, कुडाळपर्यंत २० हजार पत्रके जिल्ह्यात पोहोचवली जात होती. तुरुंगात झाडपाल्याची आमटी दिली जायची, त्यामुळे सर्वांना उष्णतेचा त्रास झाला. त्यामुळे शहरातून ताकांचे कॅन तुरुंगात आणून दिले जात होते. ढेकूणांचा त्रासही सहन केला. न्यायालयात हजर केले असता कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अॅड. नानासाहेब पंडित हे आमच्या बाजूने उभे राहिले. भारतमाता की जय अशा घोषणा देणे देशविरोधी नाही, पाच जणांनी एकत्र येऊ नये, असे न्यायालयाने सांगितले व आमची मुक्तता करण्यात आली.

सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले. याप्रसंगी खासदार नारायणराव राणे यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केला. आणीबाणीविषयक प्रदर्शनी यावेळी मांडण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button