८ मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा १५ वा वर्धापनदिन

श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक ८ में २०२६ रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे ५०० वर्षापूर्वी सन १५१० ते १५१२ या काळात टेरव येथे करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन १८३९ साली सदर मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर या जुन्या लाकडी कौलारु मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करुन दिनांक ८ मे २०११ रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर, यांचे शुभहस्ते आणि ह.भ.प. भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर मंदिर स्थापत्यशास्त्राच्या कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना असून, आई भवानी वाघजाई मातेचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभते.

१५ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, नवचंडी हवन, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, दुपारी महाआरती, महाप्रसाद व संध्याकाळी भजन, महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने सदर देवस्थानास पर्यटनाचा क दर्जा तसेच तीर्थ क्षेत्राचा ब दर्जा बहाल केला आहे. कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे भव्यदिव्य मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी रस्ता, भव्य मंदिर, भैरी भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी आणि नवदूर्गांसह इतर देवतांच्या आकर्ष मूर्ती, प्रशस्त उद्यान आणि देवरहाटीतील गारवा यामुळे या ठिकाणी पर्यटक आकर्षित होत आहेत. श्री क्षेत्र टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी – वाघजाई मंदिर हे धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. तरी आपण सर्वांनी सदर मंदिराच्या पंधराव्या वर्धापनदिनी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button