हौशी नाट्यस्पर्धांवर बंदीची टांगती तलवार; कलावंतांमध्ये नाराजी


महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध नाट्यपरंपरेत कामगार कल्याण मंडळाच्या हौशी नाट्यस्पर्धांचे महत्त्वाचे स्थान आहे. १९५३ पासून सुरू झालेल्या या स्पर्धांनी अनेक गुणी कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक घडवले. मात्र यावर्षी ७१व्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पर्धांच्या अंतिम फेरीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
निवडणुका आणि आचारसंहितेमुळे प्राथमिक फेरी उशिरा पार पडली. अंतिम फेरी अद्याप बाकी असतानाच ती रद्द करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांपेक्षा इतर कलावंतांचा सहभाग वाढल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी या नियमांमध्ये बदल स्वतः कामगार कल्याण मंडळानेच वेळोवेळी केले होते, अशी टीका रंगभूमीशी संबंधितांकडून होत आहे.
गिरणगावातील कामगारांनी उभी केलेली ही रंगभूमी मराठी व्यावसायिक नाटकासाठी कलाकारांची मोठी शाळा ठरली. सदाशिव अमरापूरकर, मच्छिंद्र कांबळी, विजय कदम यांसारखे अनेक दिग्गज कलाकार याच स्पर्धांतून पुढे आले. त्यामुळे या स्पर्धा बंद करण्याचा प्रयत्न म्हणजे हौशी कलावंतांच्या आत्मसन्मानावर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्य नाट्यस्पर्धांबाबतही विविध वाद सुरू असून भविष्यात अशा स्पर्धांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कला आणि कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button