
रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या वाढत्या पर्यटकांमुळे या हंगामात मोठी उलाढाल
रत्नागिरी म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो अथांग अरबी समुद्र, फेसाळणार्या लाटा, हापूस आंब्याचा दरवळ आणि कोकणी माणसाचा मनमिळावू पाहुणचार. गेले काही महिने याच रंगात न्हाऊन निघालेल्या रत्नागिरीतील पर्यटनाचा गजबजाट आता हळूहळू शांत होताना दिसत आहे. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन हंगाम संपला असून, पर्यटकांनी आठवणींची शिदोरी सोबत घेत आपापल्या घरांचा रस्ता धरला आहे.
यंदाचा पर्यटन हंगाम रत्नागिरीसाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरला. हिवाळ्यापासूनच पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागली होती. त्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात आलेल्या हापूस आंबा हंगामामुळे पर्यटनाला अधिकच चालना मिळाली. गणपतीपुळे, मुरुड, आरे-वारे, गुहागर आणि केळशी या समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
किनार्यांवर सुरू असलेल्या वॉटर स्पोर्ट्स, उंट आणि घोडेस्वारी तसेच सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी होत होती. अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि घरगुती होमस्टे काही आठवडे आधीच हाऊसफुल्ल झाले होते. पर्यटनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, वाहन चालक आणि आंबा विक्रेत्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळाली. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.www.konkantoday.com




