
कोकणातील प्रमुख नगदी पीक असलेल्या काजूच्या उत्पादनात यंदा मोठी घट
कोकणातील प्रमुख नगदी पीक असलेल्या काजूच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह कोकण पट्टयातील बागायतदार गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, राजापूर आदी भागांमध्ये काजू उत्पादनावर निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.सध्या बाजारात काजूला १६० ते १७० रुपये प्रति किलो असा समाधानकारक दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा माल नसल्याने या वाढीव दराचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. परिणामी चांगल्या दराची संधी असूनही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
हवामानातील बदलामुळे काजू बागांमध्ये कीड व विविध रोगांचा प्रादुर्भावही वाढला. यामुळे तयार होणाऱ्या फळांची संख्या कमी झाली आणि गुणवत्तेवरही परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी खर्च केला असला तरी अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
काजू बागायतदारांनी खत, औषधे, मजुरी आदींसाठी केलेला खर्च मोठा आहे. मात्र उत्पादन घटल्याने हा खर्चही निघणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना तर तोट्याचा सामना करावा लागत आहे




