
ओळखीचा फायदा घेऊन १ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल….
रत्नागिरी, ता. २३ ः ओळखीचा फायदा घेऊन दोन सोन्याच्या अंगठ्यांची परस्पर विक्री आणि गहाण ठेवून १ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकर उघड झाला आहे. “पैसे किंवा अंगठ्या काहीही देणार नाही, जास्त त्रास दिलास तर हातपाय तोडून संपवून टाकीन,” अशी धमकी देणाऱ्या राजीवड्यातील एका संशयिता विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथम जयेश खानविलकर (वय २३, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद रवींद्र पोकले (वय २५, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २९ मार्च २०२६ ला आरोग्य मंदिर येथील हॉटेल सितारा इनमध्ये तक्रारदार कामावर असताना, संशयित आरोपीने तक्रारदाराच्या वडिलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या विश्वासाने घेतल्या होत्या. यातील ६ ते ७ ग्रॅमची अंगठी (किंमत १,१०,००० रुपये) आरोपीने सराफाला विकली, तर २ ते ३ ग्रॅमची गोमेद जडलेली अंगठी (किंमत ४५,००० रुपये) मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले.
या दोन्ही व्यवहारातून मिळालेले पैसे प्रथमेशने स्वतःसाठी वापरले. २० एप्रिलला मारुती मंदिर येथे पोकले यांने आपल्या अंगठ्या परत मागितल्या. मात्र प्रथमेश त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत कॉलर पकडून धक्का दिला. “पैसे किंवा अंगठ्या काहीही देणार नाही, जास्त त्रास दिलास तर हातपाय तोडून संपवून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ११५(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.




