
केंद्रीय मंत्री डॉ. जीतेंद्र सिंह यांच्या हस्ते ’ओपन-सी’ सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचा यशस्वी शुभारंभ
भारताच्या सुमारे ७,५०० किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा आर्थिक कणा असलेल्या ’ब्ल्यू इकॉनॉमी’ला (सागरी अर्थव्यवस्था) आता विज्ञानाची आधुनिक जोड मिळाली आहे. अंदमान समुद्रात देशातील पहिल्या ’ओपन-सी’ (खुल्या समुद्रातील) सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचा यशस्वी शुभारंभ नुकताच केंद्रीय मंत्री डॉ. जीतेंद्र सिंह यांच्या हस्ते झाला. हा प्रकल्प केवळ एका बेटापुरता मर्यादित नसून भविष्यात रत्नागिरीसह संपूर्ण मत्स्यसंपन्न कोकण किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलणारा ठरु शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अंदमान निकोबारमधील श्री विजयपूरम जवळील ’नॉर्थ बे’ येथे कार्यान्वित झालेला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभा राहिला आहे उद्घाटन प्रसंगी डॉ. जीतेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षे भारताच्या अफाट सागरी संसाधनांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिमालय आणि भूभागाप्रमाणेच समुद्रातील संपत्तीचा वापर करून देशांचा विकास साधला जात आहे.www.konkantoday.com




