
जानेवारीपासून शिधापत्रिकेवरील धान्याच्या प्रमाणात बदल
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी वितरित करावयाचे अन्नधान्याच्या मासिक नियतन प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे. अंत्योदय शिक्षापत्रिकेसाठी आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीसाठी मिळणार्या एकूण धान्यात बदल न करता आहे त्या धान्यातील तांदूळ आणि गहू याच्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. हा बदल जानेवारी २०२६ पासून सर्व शिधापत्रिकांना लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २० किलो व गहू प्रती शिधापत्रिका १५ किलो वाटप करण्यात येणार आहे. याआधी याच शिधापत्रिकेसाठी २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू देण्यात येत होता. आता तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मात्र या रेशन शिधापत्रिकेसाठी सरासरी ३५ किलो इतकीच धान्यमर्यादा ठेवण्यात आली आहे.
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकेसाठी प्रती लाभार्थी ५ किलो धान्य या प्रमाणात आतापर्यंत ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू असा लाभ देण्यात येत होता. मात्र आता जानेवारी २०२६ पासून प्रती सदस्यांकरिता ३ किलो तांदूळ व २ किलो गहू असा बदल करण्यात आला आहे.
माहे डिसेंबर २०२५ साठी पूर्वीप्रमाणेच म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २५ किलो व गहू प्रति शिधापत्रिका १० किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंबाना लाभार्थी सदस्य संख्या प्रती सदस्यांकरिता ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे आहे.www.konkantoday.com




