
कोकणात गुलाबी थंडीची चाहूल, नागरिक सुखावले
सध्या कोकणात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, उशिरा का होईना पण नोव्हेंबर महिन्यात अखेर कोकणात धुकं पडायला सुरुवात झाली आहे. नदीलगतच्या भागात आणि डोंगररांगांवर निसर्गाने धुक्याची चादर पांघरली आहे.
रत्नागिरीजवळील अनेक परिसरात गेल्या चार ते सहा दिवसांपासून सकाळी दाट धुक्याचे दृश्य दिसत असून, सकाळी दहा वाजेपर्यंत हे धुकं हटत नाही. निवळी घाटातील रस्त्यांवरुन गाड्या दाट धुक्यातून वाट काढत जाताना एक वेगळाच नजारा दिसतो. त्यामुळे या निसर्गरम्य दृश्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक आणि बाईक रायडर्स निवळी घाटाकडे धाव घेत आहेत. थंडीचा पार खाली येऊ लागल्याने कोकणातील हवेचा गारवा वाढला आहे. बोचरी थंडी आणि दाट धुक्याने कोकणातील घाटरस्ते स्वर्गीय रुप धारण करत आहेत. घाट माथ्यावरच्या डोंगरांवरुन धुक्यात अंधुक दिसणारे डोंगर, लपाछपी खेळणारी हिरवाई आणि वळणावळणात हरवलेले रस्ते हे दृश्य डोळ्यात साठवावे असेच आहे.
निवळी घाटाशेजारील बावनदी परिसरातील पाण्यामुळे इथं धुक्याचं प्रमाण अधिक दिसत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत घाटात धुक्याची दाट यादर पसरलेली असते.
www.konkantoday.com




