
रेंगाळलेल्या चिपळूणच्या उड्डाणपुलाचे ७० टक्क्यांहून काम पूर्ण, एप्रिलपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दीर्घकाळ रखडलेल्या कोकणातील सर्वाधिक लांबीच्या चिपळूणच्या उड्डाणपुलाचे काम सध्या वेगवान होत आहे. तब्बल ३२५ कामगार त्यासाठी दिवसरात्र राबत असून साडेतीनशे मीटरचे स्लॅबचेही काम पूर्णत्वास गेले आहे. सद्यस्थितीत ७३.५० टक्के पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या मार्चपर्यंत उर्वरित काम पूर्णत्वास जाईल. एप्रिलपासून या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली जाईल. या पद्धतीने सध्या नियोजन करण्यात आले आहे.
महामार्ग चौपदरीकरणात पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरच्या चिपळूण टप्प्यात बहाद्दूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत १,८४० मीटरचा ×उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. कोकणातील सर्वाधिक लांबीच्या असणार्या या पुलाचे काम ५ वर्षापूर्वीच सुरू करण्यात आले होते. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. परिणामी समितीच्या अहवालानंतर पुलाचा मूळ आराखडा बदलण्यात आला. त्यानुसार पूल उभारणीत ४० मीटरच्या गाळ्यांचे अंतर कमी करून ते २० मीटरवर ठेवले गेल्याने अतिरिक्त पिलर उभारावे लागले. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम काही काळ आणखीनच रखडले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या पुलासाठी महामार्ग कंत्राटदार ईगल इन्फ्रा कंपनीने स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करून त्याच्यामार्फत पुलाचे काम हाती घेतल्याने सध्या या पूल उभारणीला वेग आला आहे.www.konkantoday.com




