
एसटी तोट्यात जाण्याची अनेक कारणे, एसटी कर्मचार्यांनी मांडली वास्तवाची बाजू
प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस्टी) लालपरी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. शासनाकडून प्रतिपूर्ती रक्कमा वेळेत न मिळणे, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, वाढते परिचालन खर्च, अवैध प्रवासी वाहतूक आणि नियोजनातील अडचणी यामुळे महामंडळ तोट्यात जात असल्याची भावना अधिकारी-कर्मचार्यांमधून व्यक्त होत आहे.
महामंडळातील अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. अनेक ठिकाणी एका कर्मचार्याकडून अनेक जबाबदार्या पार पाडून घेतल्या जात आहेत. जिथे ४० जणांची गरज आहे, तिथे १० जणांकडून काम करून घेतले जाते, अशी व्यथा कर्मचार्यांनी व्यक्त केली.
एस्टीच्या विविध सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणार्या प्रतिपूर्ती रक्कमा वेळेत न मिळाल्याने आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे. निधीअभावी आगारातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, दुरुस्तीची कामे अनेक ठिकाणी रखडल्याचे सांगितले जाते.




