
जलजीविकेच्या वतीने भाट्ये किनारा येथे स्वच्छता अभियान
रत्नागिरी : जागतिक ओझोन दिनानिमित्त जलजीविका संस्थेच्या वतीने शहराजवळील भाट्ये येथे किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये सरपंच श्रीमती भाटकर व अन्य ग्रामपंचायत सदस्य, गावकरी तसेच प्रेमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनीअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट आणि देव- घैसास-कीर-कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उत्साहाने सहभागी झाले. सोबत कांदळवन प्रतिष्ठान आणि कांदळवन कक्षाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
या स्वच्छता अभियानात भाट्ये किनाऱ्यावरील परिसरातील मोठ्या प्रमाणातील कचरा गोळा करून पोत्यांमध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर तो कचरा नियमानुसार नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर सुरक्षितपणे डिस्पोज करण्यात आला. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.




