
येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
आता पुन्हा एकदा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाब च्या परिसरात सक्रिय असणार आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 25 ते 28 ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
दरम्यान पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.