आणीबाणीत कारावास भोगलेले आडिवरे गावचे सुपुत्र अनिल लोटलीकर यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार.

आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रमात लोकतंत्र सेनानींचा सत्कार.

रत्नागिरी : देशात १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे उभे राहिल्याबद्दल मूळचे आडिवरे (ता. राजापूर) येथील आणि सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले अनिल रामनाथ लोटलीकर यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा २५ जून रोजी राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते.रामनाथ सीताराम लोटलीकर हे मूळचे आडिवरे-राजवाडी (कांगापूर) येथील रहिवासी. त्यांचे सुपुत्र अनिल लोटलीकर हे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. अनिल यांनी त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी आणीबाणीच्या काळात आर्थर रोड तुरुंगात ४ महिने कारावास भोगला. आज त्यांचे वय ७५ वर्षे आहे.

तत्कालीन नेते जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासमवेत त्यांनी काम केले आहे. याप्रसंगी बोलताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, “देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया.” कार्यक्रमादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील श्रीपाद गंगाधर मुसळे, अनिल रामनाथ लोटलीकर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मेधा सोमय्या, उदय माधवराव धर्माधिकारी, राजेंद्र यादव या सेनानींचा सत्कार करण्यात आला.

आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, लोकतंत्र सेनानी उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले. सुरूवातीला आणीबाणी काळातील मान्यवरांनी चित्रमय प्रदर्शनाची पाहणी केली. आभार मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button