
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून ऑरेंज अलर्ट
राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आता 12 जून रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण कोकणासोबत मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. दक्षिण कोकणात शुक्रवारपासून पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मुंबईत दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढेल,
गुरुवारी मुंबईत ढगाळ वातावरण राहील. तसेच मेघगर्जनेसह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यानंतर 13 जूनपासून पावसाचे प्रमाण वाढेल. हवामान विभागाने 13 जूनपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पावसामुळे राज्यात तापमानामध्येही घट होऊ शकते. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी गुरुवारपासून चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.