
अधिसंख्य कर्मचाऱ्यांना आश्वासित योजना व अनुकंपा धोरणाचा लाभ मिळावा ‘ऑफ्रोह’ची निवेदनातून मागणी.
रत्नागिरी : अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षांनंतरचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचा लाभ मिळावा तसेच २३ जुलै २०२४ चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक रद्द करून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र चे वतीने प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी केली. याबाबतचे ऑफ्रोह शाखा रत्नागिरीचे निवेदन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वीकारले.
अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द करण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना २१ डिसेंबर २०२१ रोजी अधिसंख्य पदावर वर्ग करून अन्याय केला होता. या अन्यायाची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने १४ डिसेंबर २०२२ रोजी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्त वेतन मंजूर करण्यात आले. तसेच त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नियमित वेतनवाढी मिळण्यासाठी १ दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आला. तथापि १०, २०, ३० वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजना व नियमित पदोन्नतीचे लाभ आणि अनुकंपा नोकरीवर धोरणाचे लाभ नाकारण्यात आले.हे लाभ मिळण्यासाठी ‘ऑफ्रोह’तर्फे अनेक वेळा निवेदने देण्यात आली; परंतु शासनाने दखल न घेतल्याने आज (२९ मे) रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी ऑफ्रोह महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषाताई पारशे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, ऑफ्रोह रत्नागिरीचे सचिव किशोर रोडे, उपाध्यक्ष नंदा राणे, कोषाध्यक्ष सतीश घावट, वसंत म्हस्के, श्रीकृष्ण भांडे, विलास घावट, गोकुळा धनी, प्रमिला घावट, कमल वडाळ, संगिता रामागडे आदी उपस्थित होते.