
चांगला उद्योजक होण्यासाठी संयम ठेवा – श्री. गौरांग आगाशे
रत्नागिरी शिक्षण संस्था संचलित अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “श्री. शंकर ढोले स्टुडंट्स एन्ट्रीचमेंट सेल” उपक्रमा अंतर्गत श्री. गौरांग आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उद्योजकता, ई – कॉमर्स आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नोत्तर या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. गौरांग आगाशे यांनी “उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी थोडा संयम ठेवा आणि मार्केट मधील विविध गॅप (संधी) शोधा.” असे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
उद्योगांमध्ये जे जे नवीन तंत्रज्ञान मोठ्या शहरांमध्ये येते त्याची सुरुवात रत्नागिरीमध्ये कधीतरी होणारच आहे या विचारातूनच ई-कॉमर्स कडे आपण वळलो अशी भावना श्री गौरांग आगाशे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य श्री सुनील गोसावी, पर्यवेक्षक श्री विद्याधर केळकर, वाणिज्य शाखाप्रमुख सौ शिल्पा तारगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सध्याचा विद्यार्थी हा अध्ययनार्थी व्हावा यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मत प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांनी मांडले. उपप्राचार्य श्री सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक व्हा आणि रोजगार निर्मिती करा अशा प्रकारचे आवाहन केले.
श्री. गौरांग आगाशे यांच्या विचारांची आणि अनुभवांची सांगड आपल्या अभ्यासक्रमाशी घालून उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना श्री. आगाशे यांनी समर्पक उत्तरे दिली. “श्री. शंकर ढोले स्टुडंट्स एन्ट्रीचमेंट सेल” ची स्थापना वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यवहारचातुर्य, निर्माण करणे तसेच व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि वृद्धिंगत करणे या हेतूने करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील 297 विद्यार्थी उपस्थित होते. सौ विस्मया कुलकर्णी, दीपा टिकेकर,श्रीमती माधवी लेले श्री भूषण केळकर आणि श्री. भालचंद्र रानडे हे शिक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री प्रभात कोकजे, वक्ता परिचय कु. प्रणया चांदोरकर आणि आभार प्रदर्शन कुमार भावेश सावंत यांनी केले.