
११५ ऐवजी १०५ जागांवर लढण्याची काँग्रेसनेही दाखवली तयारी.
हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रातील मविआच्या जागा वाटपावर काहीही परिणाम नाही. आम्ही ११५ जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सांगितले होते.ते दिल्लीत राहुल गांधींना भेटून आल्यामुळे त्यांच्या दाव्यात ठामपणा असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी चित्र बदलले असून ११५ ऐवजी १०५ जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. सूत्रांनी सांगितले की, जागा वाटपावरून कोणतीही ताणाताणी नको, असा नवा निरोप हायकमांडकडून मंगळवारी सकाळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आला. त्यानुसार काँग्रेस १०५, उद्धवसेना १०० आणि शरद पवार गट ८३ असा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्य पिंजून काढले असून तीनही पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. बहुतांश मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आहेत. मविआत सर्वाधिक बैठकांचे सत्र काँग्रेसमध्ये सुरू आहे. मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली.