
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर आकारले जाणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क पूर्णपणे रद्द
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, यंदा गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर आकारले जाणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.या निर्णयामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरातील कोकणवासीयांचे एसटी बस आणि गणेशोत्सवाशी एक अनादी आणि घट्ट नाते आहे. मुंबईतील घरापासून ते अगदी कोकणातील आपापल्या गावातील वाड्या-वस्त्यांपर्यंत थेट एसटी बसने प्रवास करता येत असल्याने, चाकरमानी नेहमीच एसटी प्रवासाला पहिली पसंती देतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणासाठी सरासरी पाच हजारांहून अधिक बसेस आरक्षित केल्या जातात. यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्याच्या उद्देशाने, नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, या अतिरिक्त शुल्काच्या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय आणि गणेशभक्त मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अनेक नागरिकांनी आणि शिष्टमंडळांनी थेट प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच निवेदनांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती. कोकणवासीयांच्या या हाकेला साद देत एकनाथ शिंदे साहेबांनी या मागणीचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार केला.कोकणवासीयांच्या भावनांचा व गणेशोत्सवाच्या पवित्र परंपरेचा सन्मान करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला हे अतिरिक्त शुल्क तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटी प्रशासनाने हा निर्णय अधिकृतपणे मागे घेतला आहे. शासनाच्या या जनहितकारी निर्णयामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासातील आर्थिक ताण कमी झाला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.




