टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांसाठी ८ सप्टेंबर रोजी ५९ वी ‘पेन्शन अदालत’; २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. २१ ):- मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ५९ व्या ‘पेन्शन अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे होणार आहे.
या पेन्शन अदालतमध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी तसेच सेवेत असताना निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित आणि तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेऊन ती निकाली काढली जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा राज्यातील टपाल विभागाच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक विषय, शिस्तभंगाची प्रकरणे, डीपीसी (DPC) पुनरावलोकन आणि पूर्णपणे न्यायालयीन किंवा कायदेशीर स्वरूपातील बाबींचा विचार या अदालतीमध्ये केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इच्छुक निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारीचे अर्ज विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये ‘वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई’ या पत्त्यावर २५ ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील; सामुदायिक अथवा इतरांच्यावतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच २५ ऑगस्ट २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही, असे मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button