
अनु. जाती व नवबौद्ध भूमिहीनांना मोफत शेतजमीन; ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजने’चा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. १७ ): शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन कुटुंबांसाठी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा आणि त्यासाठी रीतसर अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.
योजनेचे स्वरूप आणि मिळणारी जमीन
या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) भूमिहीन कुटुंबांना त्यांच्या उपजीविकेसाठी खालीलप्रमाणे मोफत शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते:
कोरडवाहू (जिरायती) जमीन: ४ एकर (जमिनीची कमाल किंमत रु. ५.०० लाख प्रति एकर)
किंवा ओलिताखालील (बागायती) जमीन: २ एकर (जमिनीची कमाल किंमत रु. ८.०० लाख प्रति एकर)
लाभार्थी निवडीचे निकष
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.
लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि भूमिहीन असावा.
लाभार्थ्यांचे वय १८ ते ६० वर्षे या दरम्यान असावे.
निवडीचा प्राधान्यक्रम
योजनेअंतर्गत लाभार्थी निवडताना समाजातील काही विशेष घटकांना प्राधान्य दिले जाते. हा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे राहील:
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्त्या स्त्रिया.
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन विधवा स्त्रिया.
अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनु. जातीचे अत्याचारग्रस्त नागरिक.
संपर्क आणि अर्ज कुठे करावा?
इच्छुक व पात्र अर्जदारांनी या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी खालील पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा:
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, रत्नागिरी.




